Thursday 26 January 2017

प्रतापगडाची लढाई

प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाची लढाई आहे. प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात रोमांचक क्षण मानला जातो. शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या रुपात आलेले स्वराज्यावरील संकट अफजलखानाचा वध करून तसेच त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतवून लावले.

पार्श्वभूमी

शिवाजींनी पुण्याजवळील मावळ प्रातांत नियंत्रण मिळवले होते. त्या वेळेस हा भाग अदिलशाहीच्या अखत्यारीत येत होता त्यामुळे त्यांच्या दृष्टीने शिवाजीचा बंदोबस्त करणे आवश्यक होते. विजापूरच्या दरबारात शिवाजींचा बंदोबस्त करण्याची मोहिम अफजलखानाकडे देण्यात आली. अफजलखानाने यापूर्वी शिवाजींचे थोरले बंधु संभाजी यांची हत्या केली होती तसेच आदिलशाही दरबारात त्याचे व शिवाजींचे वडील शहाजी यांचेही वैर होते. अफजलखान मोठा फौजफाटा घेउन विजापूरहून जून १६५९ मध्ये निघाला. वाटेत येताना इस्लामच्या प्रथे प्रमाणे तो देवळे पाडत व मुर्तीभंजन करत आला. तसेच खानाचा विजय व्हावा म्हणून वाईच्या ब्राम्हणांनी खानाकडून दक्षिणा घेउन मोठा होमयाग केला. शिवाजींनी खान येत आहे सुद्धा बातमी ऐकल्यावर आपला मुक्काम राजगडावरून घनदाट जंगलातील आणखी दुर्गम असलेल्या प्रतापगड येथे हलवला. अफजलखानाने तुळजापूर च्या भवानी मंदीराचा उध्वंस केला व आपली नजर पंढरपूर च्या विठ्ठ्ल मंदीरावर वळवली. खानाचा असा अंदाज होता की मंदीरे अश्या प्रकारे उधव्स्त केली तर शिवाजी चिडून उघड्यावर येउन युद्ध करतील परंतु शिवाजी महाराजांनी अजूनच बचावाचा पावित्रा घेतला. खानाने आपला मुक्काम वाई येथे टाकला. तो पूर्वी वाईचा सुभेदार असल्याने त्याला त्या भागाची चांगली माहिती होती.

सैन्यबळ

अफजलखानाच्य सैन्यात अनेक स्रदारांचा समावेश होता. त्यातील काही प्रमुख सय्यद बंडा, फाजलखान, अंबरखान, याकुतखान, सिद्दी हिलाल, मुसाखान तसेच काही मराठे सरदार पिलाजी मोहिते, प्रतापराव मोरे इत्यादी जे आदिलशाहीत चाकरीला होते. त्याच्या फौजेत १२,००० च्या घोडदळाचा समावेश होता तसेच १०,००० पायदळ तसेच १,५०० बंदूकधारी सैनिक, ८५ हत्ती व १,२०० ऊंटांचा समावेश होता. तसेच ८० ते ९० तोफा होत्या. अफजलखानाने जंजिर्‍याच्या सिद्दीशी हातमि़ळ्वणी करून कोकणच्या बाजूनेही आपले पाश आवळले.

शिवाजी-अफजलखान भेट व व्दंद

शिवाजींनी आपले दूत पाठवून खानाला आपण घाबरलो असल्याचे दाखवले व आपल्याला खानाशी युद्ध करायचे नाही व समझोत्यास तयार आहोत हे कळवले. खानाने प्रथम वाईस बोलवणे धाडले, पण शिवाजींनी नकार दिला. दोन्ही बाजूंकडून घातपाताची शक्यता होती. परंतु शिवाजींनी आपण खूपच घाबरलो असल्याचे खानाला दाखवले व खान प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला तयार झाला. भेटी दरम्यान दोन्ही पक्ष कोणतेही हत्यार वापरणार नाही असे ठरले. प्रत्येक पक्षाचे १० अंगरक्षक असतील व त्यातील एकजण शामियान्या बाहेर थांबेल. व इतर अंगरक्षक दूर रहातील असे ठरले. भेटीची वेळ नोव्हेंबर १० इ.स. १६५९ रोजी ठरली.
भेटीच्या दिवशी अफजलखान भेटीच्या वेळेआधीच शामियान्यात आला. शिवाजींनी जाणून बूजून अतिशय भव्य शामियाना बनवला होता. निःशस्त्र भेटायचे ठरले असले तरी खानाने आपल्या अंगरख्याखाली बिचवा लपवला होता व खानाकडून घातपाताची शक्यता शिवाजींनी १०० टक्के धरली होती त्यामुळे त्यांनी अंगरख्या खाली चिलखत चढवले होते व लपवण्यास अतिशय सोपी वाघनखे हातामध्ये लपवली होती. भेटीच्या सुरुवातीसच खानाने शिवाजींना अलिंगन देण्यास बोलवले व उंच अफजलखानाने शिवाजींना आपल्या काखेत दाबून बिचव्याचा वार केला. परंतु चिलखत असल्याने शिवाजी महाराज बचावले. खानाने दगा केलेला पाहून शिवाजींनी लपवलेली वाघनखे काढली व खानाच्या पोटात घुसवून त्याची आतडी बाहेर काढली. अनपेक्षित प्रतिवाराने भेदरलेल्या खानाने दगा दगा असा आक्रोश केला व इतर अंगरक्षकांना सावध केले. इतर अंगरक्षकांच्यात तिथेच जुंपली. सय्यद बंडाने शिवाजींवर वार केला परंतु तो जिवा महालाने आपल्यावर घेतला व शिवाजींचा रस्ता मोकळा केला. वाटेत शिवाजींना खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी यांने अडवले व वार केला परंतु शिवाजींनी त्याला ठार मारले. इकडे खान त्याच्या पालखीत स्वार झाला परंतु संभाजी कावजीने प्रथम पालखी वाहणार्‍या भोईंचे पाय तोडले व जखमी अफजलखानाला मारून त्याचे शीर धडापासून अलग केले. शिवाजींनी हे शीर नंतर आपल्या मातोश्रींना भेटीदाखल पाठवले. शिवाजींनी झपाट्याने किल्यावर प्रयाण केले व तोफांनी आपल्या सैन्याला अफजलखानाच्या सैन्यावर आक्रमण करायचे आदेश दिले.

लढाई

मराठे सैनिकांच्या तुकड्या प्रतापगडाच्या जंगलात दबा धरून बसल्या होत्या. तोफा धडाडताच त्यांनी अफजलखानाच्या सैन्यावर झपाट्याने काही कळायच्या आत आक्रमण केले. कान्होजी जेधे याने बंदूकधार्‍यांवर आक्रमण केले. दुसर्‍या एका कमानीच्या हल्यात मुसाखान जखमी झाला व पळून गेला. अफजलखानाच्य सैन्याची वाताहत झाली. नेताजी पालकर यांच्या नेतृत्वाखाली मराठा घोडदळाने अफजलखानाच्या वाईच्या तळावर अचानकपणे हल्ला चढवला व तेथेही त्यांची वाताहत केली.

लढाईनंतर

आदिलशाही सेनेसाठी हा जबरदस्त पराभव होता. अफजलखानाचा वध ही संपूर्ण आदिलशाहीसाठी मोठी घटना होती. जवळपास ५,००० सैनिक मारले गेले व तितकेच जखमी झाले. जवळपास ३,००० सैनिक युद्धबंदी बनवण्यात आले. मराठ्यांचे पण त्यांच्या सैनिकक्षमतेच्या दृष्टीने थोडेफार नुकसान झाले. शिवाजींनी विरोधी सैन्यातील बंदीवानांना योग्य तो मान दिला. जखमींची योग्य ती शुश्रुषा केली गेली. कोणत्याही बंदीवान स्त्री अथवा पुरुषांवर अत्याचार झाले नाहीत. बऱ्याच जणांना परत विजापूरला पाठवण्यात आले.
पुढील १५ दिवसात शिवाजी महाराजांनी सातारा, कोल्हापूरकोकणात किल्ले काबीज करायचा धडाका लावला व त्यात त्यांना नेत्रदीपक यश मिळाले. कोल्हापूर जवळील पन्हाळा किल्यापर्यंत त्यांनी मजल मारली. या घटनेनंतर शिवाजी महाराजांची एक कुशल नेता म्हणून ओळख प्राप्त झाली. अफजलखानासारख्या बलाढ्य सेनापतीचा पार धुव्वा उडवल्यामुळे शिवाजींचा भारतभर लष्करी दरारा वाढला.

साहित्यात व चित्रपटात

शिवाजींच्या जीवनावर आधारीत प्रत्येक चित्रपटात ही लढाई खासकरून शिवाजींचे अफजलखानाबरोबरचे द्वंद्व दाखवतातच. लेखक रणजित देसाई यांची लक्ष्यवेध ही या लढाईवर आधारित कादंबरी प्रसिद्ध आहे.

 

No comments:

Post a Comment